“झोपेतली बडबड : रस्ते, गाई आणि कुत्रे”
काळ-पहिला लॉकडाऊन
दृश्य -निर्मनुष्य रस्ते आणि रस्ते चिंताग्रस्त...
हमरस्ता(स्वगत) - खेटुन चालणारी वाहने,आपल्याच मस्तीत जाणाऱ्या गाड्या, रस्त्याच्या मधोमध येणारा आणि घसा फुटेपर्यंत ओरडणारा बाजार,तर्रीSसाठी मरणारी गर्दी गेली कुठे? एका पायावर पूर्ण भार टाकून सवारीला ओढत आणणारा रिक्षावाला गेला कुठे? टोपलीत वीस-पंचवीस निंब विकण्यासाठी दिवसभर मरणारी
म्हातारी गेली कुठे?? .. अरे कोणी सांगणार आहेत का मला? माण्सं रस्त्यावर का येत नाहीयं? ..आपल्या रस्त्याचे काम तर कोणी काढलेले
नाही नां? नाही,आपण एवढे बधिर तर नाही;
आपल्याला जाणवलं असतं.
(टिळकरस्त्याला उद्देशून)
हमरस्ता- टिळक,तुझ्या रस्त्यावरून कुणी जाणं-येणं करत आहेस का रे?
टिळकरस्ता- नाही ना!तू मोठा आणि हमरस्ता म्हणून तुला विचारायला आलो,की तूच तर पळवली नाहीस नां, माझ्या रस्त्यावरची माण्सं?
हमरस्ता- नाहिरे,मलाच गर्दी सहन होत नाही. चालता-चालता वाहनासकट दुकानात घुसतात माण्सं.
मी कशाला पळवू वेड्या... बरं गांधीला विचारतो.तो विरुद्ध दिशेनी आणि लांबून येतो.
(हमरस्ता गांधी रस्त्याला उद्देशून)
हमरस्ता- गांधी, ते जाणं-येणं सुरू आहे काय लोकांचं तुझ्या मार्गावरून?'
गांधीरस्ता- माझा मार्ग लोकांनी कधीचाच सोडला!
हमरस्ता- गांधी,तुझ्या मार्गाला लागून तो कोणता मार्ग आहे?'
गांधीरस्ता- संविधान मार्ग. त्यावरुन देखील कोणीही चालत गेलेले नाही.
हमरस्ता- गांधी,त्या रस्त्याचं नाव काय आहे? तो नाही का,रफीमार्गपासून आत जातो.आधी त्याला मडक्यारोड म्हणायचे. नंतर एक सरकारी आदेश
आला आणि त्याचे नाव बदलले.
गांधीरस्ता- तो सिल्ह्वररोड
हमरस्ता- हां सिल्ह्वर! नाव बदलले, पण हालत मडक्यापेक्षाही खराब आहे,असं सांगत होता रफीमार्ग.काय आहे की,मला जाता येत नाही तिकडे, आपला रस्ता सोडून! ..पण हे गेलेत कुठे??
..देशमुखाच्या गल्लीतले, सखारामच्या चाळीतले, चुडीमोहल्यातले पोट्टे गेले कुठे? घोड्याच्या चौकातली, आबाजीच्या मठातली, गणपतीच्या मंदिरातली,
हाजीच्या दरग्यातली माण्सें गेली कुठे??
.. मातीच्या रस्त्यावरून,रेतीच्या रस्त्यावरून,
मुरमाच्या रस्त्यावरून,डांबरी रस्त्यावरून,
सिमेंटच्या रस्त्यावरून,फरसबंदी रस्त्यावरून,
पेव्हिंग ब्लॉकवरून, फुटपाथवरून, वळणरस्त्यावरून, ब्रीजवरून,अंडरपासवरून वाहनारी,उचंबळत जाणारी, स्वप्न पाहत जाणारी,स्वतःला ढकलत जाणारी माण्सें गेली कुठे??
.येणाऱ्यांना,येऊ इच्छिणाऱ्यांना,जाणाऱ्यांना,जाऊ इच्छिणाऱ्यांना,आलेल्यांना- गेलेल्यांना,चालणाऱ्यांना, पळणाऱ्यांना,धावणार्यांना;धावत जिथे जायचं आहे,
तिथे आम्ही धावलो.काठीसोबत तितकेच हळूवार देखील चाललो. चालता-चालता थकलेली माण्सं मटकन बसली,तिथेच आम्हीही बसलो...आम्हाला भोकं पडेपर्यंत फटाके वाजवणार्यांसोबत नाचलो,पालखीसोबत तल्लीन झालो,जुलूस- मोर्चांसोबत आम्हीही तितक्याच आवेशाने चाललो,अरे दंगलींच्या वेळेस आम्हीही तितकेच हादरलो.. खांदेकर्यांसोबत आम्ही हळवे झालो,कारण गेलेल्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याचं चालणं,मला आणि माझ्या असंख्य नसांना ठाऊक आहे..रस्ते चालण्यासाठी असतात.पण चालणारी माण्सं थांबली की, आम्ही आवंढा गिळतो.आम्हांला ओढ फक्त तुमच्या पावलांची.. ते भरलेले असू दे,वाकडे असू दे,
उफराटे असू दे..,आम्ही बोललो नाही. कटलेल्या बोटांचे, झिजलेल्या तळव्यांचे,एकच पाय घेऊन येणाऱ्यांचेही आम्ही स्वागतच केले.. बुटांचे,बाटांचे, सॅंडलचे, ऊंचटाकांचे,स्लीपरचे,सोल निघालेल्या जोड्यांचे,
रंग उडालेल्या वाहनेचे,दोन रंगांच्या चपलेचे, चिंध्या गुंडाळलेल्या पायांचे..या सर्व सर्व पावलांसाठी आम्ही तितकेच नम्र होतो.नम्र आहोत आम्ही...पण तुम्ही कुठे आहात??
फुलेरोड- भाई,सगळ्याच रस्त्यांना विचारून झालं. कुठल्याच रोडवर माण्सं आली आली नाहीत की गेली नाहीत.
गांधीरस्ता- रस्ते सोडण्यापुर्वी माण्सं आपल्याला सांगून गेली नाहीत. आपणच माणसांशी संवादात कुठेतरी कमी पडलेले असू.
रफीमार्ग- आपली चूक नसतांनाही आपल्या उरावर पडून माण्सं मेली,जी वाचली त्यांनी आपल्यालाच गाली दिल्या. आपण कुठे काही बोललो? .
.आपण ऐकत गेलो. आपण कायम ऐकत असतो..
टागोररोड- आपल्याला न सांगता निघून गेली, याचं कारण आता आपल्याला माहिती नाही.गाव/ शहरातील रस्ते,राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गांनाही विचारून झाले.. आता दुसऱ्या कुणाला तरी विचारावं लागेल.
टिळकरोड- विचारायला रस्त्यावर आहे कोण? विचारायचं कोणाला?
गांधीरस्ता- गाई आहेत बसलेल्या रस्त्यावर.
हमरस्ता- गाई??..काहीही हं गांधी!.. अरे,त्या रस्त्यावरच बसलेल्या असतात कधीच्या, त्यांना कोण आलं आहे सांगायला?
गांधीरस्ता- तुला रस्त्यावरचंच माहित आहे राज्या!
लोक गाईच्या कानात काही काही सांगत राहतात.
माहिती असेल तर सांगतील.
(दृश्य विभिन्न वयोगटाच्या पंधरा ते वीस गाई बसलेल्या आहेत, एकमेकींकडे पाहत..हमरस्ता एका सीनियर गाईला उद्देशून)
मालन- गेली आठ-दहा दिवसांपासून आपण पाहत आहोत की, रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही.या शहरातला,शहरातून गावाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांना, गल्ली-बोळांना,पायवाटांना विचारून झाले.त्या
कोणीही पायी चालणारी माण्से,वाहनांवरून जाणारी माण्से पाहिली नाहीत.. घरात तर असावी, पण रस्त्यावर ती का येत नाही?..
तुला काही माहिती आहे का? तुझ्या मालकाने तरी त्याबद्दल काही सांगितले का तुला??
मालनला हुंदका फुटला आणि ती रडायला लागली.
गांधीरस्ता-शांत हो मालन,काही सांगितले का तुला मालकाने.
मालन-(मालनने शेपटीने डोळे पुसले) कानात सांगायचे दूरच, कानाला भोक पाडून बिल्ला अडकवलाय.त्यालाही दोन वर्षे झाली,तेव्हापासून घरी नेले नाही. घर माहीत असल्यामुळे मी जाऊन पाहते अधून-मधून
नातवंडासहित, तर हाकलून देतो. गळ्यात साधा सुताचा दोर म्हणजे दावं नाही.सडून,पडुन गेलं एकदा. अधून मधून येतो आणि सगळ्यांच्या पोटाकडे पाहून चालला जातो. नुस्तं महिन्यांचं गणित मांडत राहतो.एखादीचे दिवस भरले की घेऊन जातो. दोन-तीन महिन्यानंतर ती पुन्हा वासरासहित आमच्यात येते. आता तर एक दीड महिन्यापासून दिसला नाही.चंद्रीचे दिवस भरत आले,कसं होईन बिचारीचं!! चार-पाच दिवस झाले, खायला काही नाही.लोकांच्या फाटकाजवळ जावं तर, फाटकही उघडल्या जात नाही..
आमच्याकडून खाल्ल्या न जाणारी झाडे,शोधून शोधून लावली माण्सांनी दारासमोर. आहे त्या झाडाचा पालाही आमच्या उंचीपर्यंत खाऊन झाला. मान जास्त वर केल्यास,मान लागुन येते.. कसं होईल या वासरांचं??..
सगळ्या रस्त्यांना वाईट वाटलं. यापूर्वी आपण कधीच
गाईवासरांशी बोललो नाही,हे त्यांना जाणवलं.रस्ता अडवणारी म्हणून केवळ चिडलो,डाफरलो. पण त्यांना खरोखरच खायला लागतं,ते आपण विसरूनच गेलो...
हमरस्ता- पण आता विचारावं कुणाला? माहित तर करून घ्यायचंय.
मालन-कुत्र्यांना विचारा,त्यांना नक्कीच माहिती असेल.
हमरस्ता- ठीक आहे.पण दिसत नाही कुठे?
मालन- ते काय एटीएम मध्ये! त्याना आता जागाच
जागा आहे..
मालन हंबरली,कुत्र्याने कान टवकारले,हमरस्त्याने आवाज दिला.
हमरस्ता- लोक रस्त्यावर दिसत नाही आठ-दहा दिवसांपासून. या रस्त्यावर नाही की, त्या रस्त्यावर नाही. गेले कुठे??
कालू- घरातच आहे नां भाऊ! टीव्ही पाहून राह्यले.
हमरस्ता-अरे पण ते रस्त्यावर का येत नाही?
कालू- येत नाही तं जाऊ द्यानां, बाहेर आले तर गोटेच मारते ना आमाले..आता मस्त आमाले झोपाले भेटून राह्यलं,कमी ऊन हाये का बाह्यरं! येटीएम्मधीच झोप्लो होतो.
हमरस्ता- परंतु एटीएम मध्ये गेला कसा?
कालू- तुम्हाले थेच् तं सांगुन राह्यलो नां. मी येटीएमजवळच उभा होतो,तं एकानं गोटा झण्णावला.
म्या तं हुकवला,पण दाराचा काच फुटला.बस आता डायरेक्ट येन्ट्री..पीननंबर टाकाची गरजच नाही..
हमरस्ता- अरे पण माणसांना झालं काय?
हमरस्ता- तुम्हाले थेच सांगून राह्यलो नां मी.घराच्या बाह्यरं तं निंघून नाही राहिले,पण खिडकीतूनच हाडं हाडं करतेत.
हमरस्ता- अरे,पण मोठी माण्सं तुला मारत नसतील?
कालू- तेयले वाकताच कुठे येते राजेहो गोटे घ्याले!
मंग काडी फिरवते.एकडाव तं फिरवता फिरवता बुढ्याची काडी निसटली.बुढा काडीजवळं गेला.
पन उचलाले वाकताच येत नव्हतं. उभा राह्यला घंटाकभर,म्हणलं पडते आता झांज यिवुन! मंग एका पोरांनं उचलून देल्ली.मी उभाच होतो वासमार्या झाडाजवय.
हमरस्ता- अरे पण सगळे विचारात पडलेआहे की,माण्सं घराच्या बाहेर निघ